Sunday, 21 April 2019

विचार

वाक्यात असलेल्या दोन शब्दातील अंतरामुळे वाक्याचा अर्थ वाचकांना लवकर कळतो. त्याचप्रमाणे नात्यात जर सुरक्षित अंतर असेल तर जगण्याचा अर्थ कळतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ एप्रिल २०१९

Friday, 29 March 2019

विचार

आपण मुलाला दोष देतो जेव्हा मुलगा आपल्या आई वडिलांना वृध्दाश्रमात ठेवतो पण एकेकाळी आपल्या सोयीसाठी तेच आईवडील आपल्या मुलाला पाळणाघरात ठेवतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ मार्च २०१९

Sunday, 24 March 2019

....तर जीव वाचला असता

सकाळी घरातून कामानिमित्त बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी घरी सुखरूप येईल की नाही याची भिती घरातील मंडळींना लागलेली असते. लोकांच्या जीवाची किंमत अगदी शून्यच झालेली आहे असेच चित्र हल्ली काहीसे दिसत आहे. आपला माणूस घरी येईपर्यंत घरच्यांच्या जीवात जीव नसतो. वेळोवेळी टीवीवर बातम्या पाहिल्या जातात. कामावरून घरी येण्यास थोडा तरी उशीर झाला तर नातेवाईक सारखे फोन करून चौकशी करीत असतात.

एखादा कुठेतरी अपघात झाला तर लोक मदत करायचे सोडून भ्रमणध्वनीमध्ये चित्रफित काढण्यात मग्न असतात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जखमी मदतीचा हात मागत असतो पण लोक त्याची मदत न करता बघ्याची भुमिका घेतात तर काहीजण भ्रमणध्वनीमध्ये त्या जखमीचे चित्रफित/ छायाचित्र काढत असतात. अशा वेळी जखमीला तातडीने मदत न मिळाल्याने त्याला त्याचे प्राण गमवावे लागते. एवढे निर्दयपणे लोक कसे वागतात हेच कळत नाही. चित्रफित काढताना त्यांच्या मनात जरा सुद्धा विचार येत नसेल का? की समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला किंवा मृत्यू पडलेला तो/ती एखाद्याचा/ची भाऊ-बहिण, आई-वडील, पती-पत्नी असेल . घरी कोणीतरी त्याची/तिची वाट पाहत असेल. देव न करो, समजा तुमच्यावरच अशी परिस्थिती आली असती तर? हा विचार करून लोकांनी अपघातग्रस्त लोकांना मदत केली पाहीजे. असे जर केले तर बरेच लोकांचे जीव वाचतील. आपले नाव होण्यासाठी, पत्रकार व लोकांचा जमाव चित्रफित, छायाचित्र काढतात व ते इतक्या जलद गती सोशल मिडियावर पसरवतील आणि आपण हे छायाचित्र काढले हे गर्वाने सांगतील. त्यात मिडियावाले तर कमालच करतात. सर्वांत प्रथम, सर्वांत जलद आम्हीच ही बातमी तुमच्यापर्यंत पोहचवली असे काहीतरी लक्ष वेधण्यासाठी सांगत असतात. काळजाचा ठोका चूकवणारी घटना घडली तरी कोणाला फरक पडत नाही कारण येथे माणूसकीच मरून गेलेली आहे.

    इमारत कोसळली, एखादा पुल कोसळला, रस्त्यावरील वाहनांचा अपघात झाला, रेल्वे दुर्घटना असे अपघात झाल्यावर आजूबाजूची जनताच जवळ असते. आणि तीच कामी येत असते.  बऱ्याच उशीराने पोलिस, अग्निशमन दल, पत्रकार, मिडीया व मदत कार्य करणाऱ्या संस्था तेथे पोहचतात. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. काहींनी तर आपले प्राण गमावलेले असतात. कोण गंभीर जखमी झालेले असतात. अशा वेळेस जवळ असलेली जनताच कामी येते पण कोणीही असे करत नाही. अपघाताचे छायाचित्र, चित्रफिती काढण्यात ही जनता मग्न असते. अपघात झाल्यावर सरकार मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख रूपये व जखमी झालेल्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास हजार रूपये देण्याचे जाहीर करते. विरोधक कोर्टात जातात. सरकारी अधिकारी वा राजकीय व्यक्तींची त्याची चूक आहे म्हणून खटला चालवला जातो. त्या घटनेतील सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित केले जाते. एक दोन दिवस ही चर्चा सुरू असते व तिसऱ्या दिवसापासून सर्व शांत. सारेजण आपापल्या मार्गाने कामाला लागलेले असतात. मिडीयावर पुन्हा एकदा मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची मुलाखत घेतली जाते. पुन्हा हळहळ सुरू होते. त्या मुलाखतीत पुन्हा एकदा अपघाताचे वेगळेच सत्य समोर येते. पिडीत नातेवाईकांची करूण कहाणी ऐकायला मिळते.  "आपला मुलगा, वडील, आई, भाऊ, बहिण अपघातात वाचू शकले असते जर जवळपास असणाऱ्या लोकांनी जखमींची मदत केली असती तर. ताबडतोब रूग्णालयात दाखल केले असते तर प्राण वाचले असते." असे काहीसे चित्र समोर येते.
    तंत्रज्ञानाची प्रगती झालेल्या देशात जागरूकता असेल तर सर्व काही शक्य आहे. थोडं विचार करण्याची गरज आहे. अपघात हा काही सांगून येत नाही. अपघात झाल्यावर सतर्कता, हुशारी दाखवली की आपल्याच सारख्या सामान्य जनतेचे प्राण वाचतील. आपल्या हातून एक चांगले कार्य झाले याचे समाधानही तुम्हाला मिळेल यासाठी आपली प्रसिद्धी बाजूला ठेवून मदत करा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ मार्च २०१९

Saturday, 16 March 2019

विचार

सुर्य उगवताना व मावळताना छान दिसतो पण तोच सुर्य डोक्यावर आला तर नकोसा वाटतो. अगदी तसंच माणसाला डोक्यावर बसू देऊ नये. त्रास आपल्याच होतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ मार्च २०१९

Friday, 22 February 2019

पोस्टमन काका

पोस्टमन काका

आनंद अश्रू येणं बंद झालं
शब्दातला चेहरा आठवताना
आठवणीत रमणे बंद झालं
दुरून आलेलं पत्र वाचताना

झोळीमधल्या सुख दुःखाचं
घरी येणं आता बंद झालं
भ्रमणध्वनीच्या काळामध्ये
पोस्टमनचं येणं बंद झालं

एक पत्र लिहून पाहूया
देऊया जगण्याला मोका
घेऊन पुर्वीचे युग तुम्ही
परत या पोस्टमन काका!

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० फेब्रुवारी २०१९

Saturday, 16 February 2019

विचार

आपण ज्या क्षणी ठाम असतो त्यावेळेस आपल्यावर आपला पुर्ण विश्वास असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ फेब्रुवारी २०१९

स्वार्थ

आपल्या डोळ्यांतील अश्रू
आपणच पुसायचे असतात
मदतीचे हात देणारे नेहमी
स्वार्थ का शोधत असतात?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ फेब्रुवारी २०१९