आपली ओळख वाढवून लोकांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात आणि आपली ओळख कोणालाही कळू नये अशा विचारांची माणसं नेहमी चुकीच्या मार्गाने चालत असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जून २०१९
आपली ओळख वाढवून लोकांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात आणि आपली ओळख कोणालाही कळू नये अशा विचारांची माणसं नेहमी चुकीच्या मार्गाने चालत असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० जून २०१९
पाऊस
पावसाने या वेळी जरा
शहाणे होऊन वागावं
मेघांने त्याला सावकाश
कमी वेग ठेवून धाडावं
होणार नाही नुकसान
काळजी दोघांनीही घ्यावी
चांगली आठवण सर्वांच्या
हृदयी कायमची ठसावी
एवढंच तुम्ही लक्षात ठेवा
बाकी काही मागणं नाही
तू चांगला बरस रे पावसा
तुझ्याशिवाय जगणं नाही
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ जून २०१९
गर्भ श्रीमंत असणाऱ्याला
पैशाची भुक मोठी असते
पोट भरणाऱ्या गरीबाची
अपेक्षा फार छोटी असते
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२८ जून २०१९
शेवटच्या श्वासाचा पाठलाग करत त्याला कैद करून ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आयुष्य जगणं होय.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ जून २०१९
आपलं दुसऱ्याला पटकन बोलून झाल्यावर (मनाला लागणे असं बोलणं) आणि ऐकून घेणाऱ्याची खरी परिस्थिती आपल्या लक्षात येईपर्यंतच्या काळात ऐकून घेणाऱ्या व्यक्तीच्या मनावर फार मोठी जखम झालेली असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जून २०१९
सर्वात जास्त वेगवान आपले विचार असतात. विचारांच्या वाटेवर एका वळणावर थांबणे (विचार करायचे थांबणे) फार गरजेचे असते. नाही थांबलो तर मानसिक संतुलन बिघडून मनावर आघात होण्याची दाट शक्यता असते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ जून २०१९
आपल्या गरजा इतक्या वाढलेल्या आहेत की त्या पुर्ण करण्यासाठी आपण तब्येतीची काळजी घेत नाही. आपण पैशाच्या मागे धावत असताना निवांतपणा विसरून गेलेलो आहे. असं म्हणायला हरकत नाही की, गरजेसमोर आराम हरलेला आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ जून २०१९
इतरांच्या बोलण्याकडे जरी आपण लक्ष देत असलो तरी सुद्धा मनाचा आवाज ऐकल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही व वैयक्तिक, कौटुंबिक होणारे नुकसान टळून जाते.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०१९
घराला नजर लागू नये व घराचं रक्षण व्हावं म्हणून आपण लिंबू-मिरची आठवडाभर आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर लावतो. शनिवार आला की आपण ते घरातून काढून रस्त्यावर फेकून देतो. याच प्रकारे माणसं माणसांसोबत वागताना दिसतात. वेळ संपल्यावर प्रत्येकाचे महत्त्व हे कमी होताना दिसत आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१९ जून २०१९
मी काहीही बोलत नाही
लेखणी जिंकून जाते डाव
उमटतं मनातलं कागदावर
साथीला घेऊन शब्द भाव
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जून २०१९
एका रंगात दूसरा रंग मिसळला तर नवीन तयार होणारा रंग मनाला मोहून जातो पण जेव्हा माणूस त्याच्या स्वभावाचे वेगवेगळे रंग दाखवतो तेव्हा जीवाला खूप त्रास होतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ जून २०१९
ओढून ताणून होत नाही
कविता सहज सुचली जाते
नाजूक शब्द फुलून सजतात
म्हणून मनात रूजली जाते
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जून २०१९
रेंगाळत होते मन माझे
देह निवांत पडून होता
बाहेर पडणाऱ्या पावसाचा
प्रत्येक थेंब तरूण होता
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जून २०१९
माणूस जेव्हा खोटं बोलत असतो तेव्हा त्याचे डोळे इमानदारीने खरे वागत असतात. त्यामुळे खोटं बोलणाऱ्याला जास्त चूका करता येत नाही व पुढे खोटेही बोलता येत नाही.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१५ जून २०१९
आपली चूक नसतानाही आपल्यावर रागवलं जातं. त्यावेळी त्याचं जास्त वाईट वाटतं. रागावणाऱ्या व्यक्तीला आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा काहीच अंदाज नसतो म्हणून चूक नसताना चूक झाली असं समजणाऱ्या व्यक्तीचं बोलणं मनात घर करून जातं.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०९ जून २०१९
परिवारातील कोणत्याही सदस्यांचा विचार न ऐकता घेतलेला निर्णय कधी कधी आपल्याच परिवाराला फार घातक असू शकतो. आपसात चर्चा केल्यावर बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात. मोठे संकट टळू शकते. म्हणून कोणावरही आपला निर्णय लादण्याच्या अगोदर एकदा परिवारातील सदस्यांशी चर्चा करावी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ जून २०१९
जगात सर्वात उंच दुसरं तिसरं काही नसून उंच हे आपले विचार असतात. त्याच विचारांच्या जोरावर माणूस उंची गाठतो. मग ती चांगल्या कामात असो वा वाईट कामात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ जून २०१९
परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आणि विचार करणं बंद होऊन जीव नकोसा झाल्यावर शेवटचा पर्याय म्हणून माणसं "आत्महत्या" करतात आणि कुटूंबाला पोरकं करतात. खरं तर "आत्म" परिक्षण करत वाईट परिस्थितीची "हत्या" करून त्यावर विजय मिळवायचा प्रयत्न करायचा असतो.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जून २०१९
काहीजण नदीचं पाणी दूषित करतात म्हणून नदी आपला मार्ग कधीच बदलत नाही. कारण त्या नदीला ठाऊक असतं की पुढच्या वळणावर तहानलेली माणसं आपली वाट पाहत असतात.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ मे २०१९