Friday 30 November 2018

नकारात्मक गोष्टी

माणसांना पहाटेच्या काळोखापेक्षा रात्रीच्या अंधाराची भिती जास्त वाटते. आपल्या मनात घर करून बसलेल्या काही गोष्टींचा त्रास हा आपल्यालाच होत असतो.

- यल्लप्पा कोकणे

Monday 26 November 2018

मुलगी वाचली

मुलगी वाचली

पोलिस ठाण्यातील फोन वाजतो. जान्हवी फोन उचलते. जान्हवी ही या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी आहे. घडलेली घटना फोनवरून ऐकून घेते. दोन हवालदार आपल्या सोबत घेऊन घटनास्थळी पोहचते. घटनास्थळी एका कचराकुंडीत जान्हवीला एक नवजात मुलगी सापडते. ती नवजात मुलगी खुप जोरजोरात रडत असताना जान्हवी तिला उचलते व तिथे जमलेल्या जमावाशी त्या नवजात मुलीची चौकशी करते. या मुलीला तेथे कोणी व कधी ठेवून गेले हे कोणीच पाहीले नाही. जान्हवी वेळ न घालवता पोलिस वाहनात बसते व तातडीने रूग्णालयात त्या नवजात मुलीला दाखल करते. नवजात मुलीचे आई वडील कोण आहे याचा शोध ती घेते पण तिला यश मिळत नाही. ती नवजात मुलगी बरी झाल्यावर तिला अनाथ आश्रमात ठेवण्याचा जान्हवी निर्णय घेते.
जान्हवी पोलिस वाहनात बसून जात असताना अचानक एक वयस्कर व थकलेली स्री रस्ता ओलांडताना जान्हवीच्या पोलिस वाहनाला येऊन धडकते व ती जमीनीवर कोसळते. त्या स्त्रीला डोक्याला खुप मार लागलेला आहे. रक्त वाहत आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्त्रीला शुद्ध नाही. तशाच अवस्थेत जान्हवी त्या स्त्रीला रूग्णालयात दाखल करते. रूग्णालयात जाईपर्यंत सखुचे रक्त खुप वाहत होते. जान्हवीच्या गाडीला धडकते तिचे सखु नाव आहे.  रूग्णालयात दाखल केल्यावर सखुला रक्ताची गरज होती. रक्त मिळाले तरच ती जगू शकत होती. डाॅक्टरांनी खुप प्रयत्न करूनही तिला रक्त मिळू शकले नाही. शेवटी जान्हवीने डाॅक्टरांकडे तिच्या रक्ताचा गट तपासण्यास सांगितले. देवाच्या कृपेने जान्हवीचा आणि सखुचा रक्तगट जुळला आणि सखुचा जीव वाचला. सखु बरी होईपर्यंत डाॅक्टरांच्या देखरेखीखाली होती. सखु पुर्ण बरी झाल्यावर जान्हवीने तिची चौकशी केली. सखुला कोणी नव्हते. ती एकटीच राहत होती. मिळेल ती कामं करून आपलं पोट भरत होती. सखुला जान्हवीने रूग्णालयात दाखल केले व रक्तही दिले म्हणून सखुचा जीव वाचला हे सखुला डाॅक्टरांकडून कळाले तेव्हापासून सखु जान्हवीला देव मानू लागली.
तिला कोणी नसल्यामुळे जान्हवी सखुला स्वतःच्या घरी घेऊन येते. जान्हवी आपल्या घरात शिरताना उंबरठ्यावरूनच तिच्या आई वडीलांना आवाज देत घरात शिरते. जान्हवीबरोबर सखुला पाहून रावसाहेब व मालतीबाई यांना आश्चर्य वाटते. रावसाहेब हे जान्हवीचे वडील व मालतीबाई आई आहे. रावसाहेब व मालतीबाईंना समोर पाहून सखुच्या पायाखालची जमीनच सरकते. ती घाबरते व हातात पदराचं टोक धरून तोंडापर्यंत घेते. त्या दोघांना समोर पाहून सखुच्या डोळ्यात पाणी येते. तिघेही सखुला तिच्या रडण्याचं कारण विचारतात पण सखु काहीही सांगत नाही. जान्हवीने सखुच्या हालचाली पाहून असा अंदाज लावला की नक्कीच सखु काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी काहीतरी महत्वाची बाब आहे जी सखु सर्वांपासून लपवत आहे. खुप दिवसांनी सखुला चांगलं जेवायला मिळालं. त्या रात्री जान्हवीला झोप आली नाही. सखु का रडली असावी? काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे? अशा विचारांनी जान्हवी गोंधळून गेली. नेहमीप्रमाणे जान्हवी ड्युटीवर गेली. सखु आता जान्हवी आणि तिच्या कुटूंबात चांगलीच  रूळत होती. पण एक अशी गोष्ट होती जी सखुची चिंता वाढवत होती. रावसाहेब व मालतीबाई यांनी सुद्धा सखुला विचारण्याचा प्रयत्न केला पण सखु काहीही सांगत नव्हती. जान्हवी संध्याकाळी घरी आली. ती आज जास्तच थकली होती आणि वैतागली सुद्धा होती. घरी आल्यावर तीने आपल्या डोक्यावरील पोलिस टोपी टेबलवर ठेवत तीची बडबड व चिडचिड सुरू झाली.  नेहमी शांत राहणारी जान्हवी आज इतकी का चिडली आहे हे जान्हवीच्या आई वडीलांना कळत नव्हते. तीची चिडचिड सखु देखील पाहत होती. थोडा वेळ थांबून मालतीबाईने जान्हवीला चिडचिडीचे पुन्हा कारण विचारले तेव्हा जान्हवी सांगू लागली की, "रोज वेगवेगळ्या तक्रारी माझ्याकडे येतात. त्यात जास्त म्हणजे महिलांवरील अत्याचार, वृद्धांचा छळ आणि रस्त्यावर, देऊळात, कचरापेटीत सापडणारी नवजात बालके. अशा नवजात बालकांना सोडून जाणाऱ्या आई वडिलांचा मला खुप राग येतो."

हे सारं सखुही ऐकत होती. सखु जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्याचं कारण कोणालाच कळत नव्हतं. सखु जान्हवीच्या दिशेने जोरात धावत आली आणि तिच्या दोन्ही पायाला हात लावत माफी मागू लागली. जान्हवी, रावसाहेब आणि मालतीबाईंनाही हा प्रकार लक्षात येत नव्हता. ही नुकतीच घरी आलेली बाई जान्हवीची माफी का मागत आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं. जान्हवीने सखुला माफी मागण्याचं कारण विचारलं तेव्हा सखु भुतकाळात शिरली आणि घडलेली घटना सांगू लागली. सखुची परिस्थिती फार गरीब होती. सखुचा नवरा आजारपणात मरण पावला तेव्हा सखुने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीला कसं पोसायचं, शिक्षण कसं होणार या विचारात सखु असायची म्हणून सखुने आपल्या नवजात मुलीला फार दुरवर जाऊन एका रस्ताच्या कडेला असलेल्या कचरापेटीत ठेवून आली. हे सारं सांगत असताना सखु ही रावसाहेब व मालतीबाई यांच्याकडे पाहत रडत बोलू लागली की, "साहेब आणि बाईसाहेब जेव्हा मी माझ्या मुलीला कचरा पेटीत ठेवून आडोशाला उभी असताना तेथून एक चारचाकी गाडी जात होती. माझ्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून तेथे गाडी थांबली व त्या गाडीतून एक जोडपे उतरले आणि माझ्या मुलीला घेऊन गेले. ते जोडपे म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही ते म्हणजे तुम्हीच होतात. मी या घरात पाऊल ठेवताच तुम्हाला पाहीलं आणि ओळखलं." हे ऐकताच जान्हवी, रावसाहेब आणि मालतीबाई आश्चर्यचकित झाले. त्यावर रावसाहेब आणि मालतीबाई एकत्र बोलले, "म्हणजे, तुम्ही जान्हवीच्या आई?" आज जान्हवीला तिची आई मिळाली. तिला खुप आनंद झाला. परिस्थितीमुळे सखुने आपल्या पोटच्या मुलीला कचराकुंडीत टाकले होते ती मुलगी आज वरिष्ठ पोलिस आहे. सखुने सर्वांची माफी मागितली. जान्हवीने सखुला म्हणजे तिच्या सख्खा आईला कडकडून मिठी मारली.

यल्लप्पा कोकणे
२६ नोव्हेंबर २०१८

Wednesday 14 November 2018

अधूरी प्रेम कहाणी

"अधूरी प्रेम कहाणी "

इनडोअर....महाविद्यालय....दिवस...

(महाविद्यालयात एक विशेष कार्यक्रम आहे. यामुळे विद्यार्थी व विद्यार्थीनी आपले वर्ग सजवत आहे. कथेतील नायिका रोहिणी एका स्टूलचा आधार घेऊन सजावट करित उभी असताना काही विद्यार्थ्यांचा तिला धक्का लागतो ती खाली पडणार तितक्यात शेजारी उभा असलेला कथेतील नायक दर्शन तिला सावरतो. बराच वेळ दोघे एकमेकांना निरखून पाहत आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत आहे.)

दर्शन- (रोहिणीला सावरत, दोन्ही हाताने आधार देत) संभाळून, कुठे लागलं तर नाही ना!

रोहिणी - नाही. तुझ्या आधारामुळे मला काहीच झालं नाही. तु जवळ होतास म्हणून मी वाचले.

दर्शन - (मनातल्या मनात बोलत होता) तुला काहीच झाले नाही पण माझ्या मनात खोलवर घाव झाला त्याचं काय?

रोहिणी - (आश्चर्यचकित होऊन दर्शनकडे पाहत) काही बोललास का?

दर्शन - (भानावर येत) नाही तर, काहीच नाही.

(दर्शन मनातल्या मनात कविता बोलू लागतो)

मला जे काही सांगायचं आहे
ते माझ्या नजरेत दाटलं आहे 
तुझ्या नजरेची भाषा वाचून
मनातलं वादळ पेटलं आहे

(दर्शन स्वतः शीच गालातल्या गालात हसू लागतो. )

..........................................................
आउटडोअर....महाविद्यालय कट्टा....दिवस...

दर्शन कट्ट्यावर बसला आहे. रोहिणी येण्याची तो वाट पाहत आहे. रोहिणी समोरून येत आहे हे पाहताच तो उभा राहतो. दोघांच्या नजरानजर होते. दर्शन रोहिणीच्या जवळ येतो.

दर्शन  - कशी आहेस?

रोहिणी- (गालात स्मित हास्य करत) मजेत. तू बाहेर काय करतोस? लेक्चरला नाही बसला.

(दर्शन आणि रोहिणी एकत्र चालत आहेत.)

दर्शन- नाही. माझं मन कशातच लागत नाही.

रोहिणी - (दर्शनकडे पाहत) का? काय झालं?

दर्शन - (रोहिणीकडे पाहत) कुठे काय! काहीच नाही.

रोहिणी - मग कशात लक्ष लागत नाही असं का म्हणालास?

दर्शन - हो, तसं विशेष आहे. सांगेन तुला वेळ आल्यावर.

(दोघे एकत्र चालत आहेत. दर्शन रोहिणीकडे एकटक पाहत आहे. ती आज खुपच सुंदर दिसत आहे. दर्शन तिच्याकडे पाहत दीर्घ श्वास घेतो व एक कविता मनातच बोलतो)

हरवलेलं मन तुझ्या प्रेमात 
तुझाच फक्त शोध घेतो
काय सांगू प्रिये तुला
भेटीचा क्षण आधार देतो

(रोहिणीही मनातच बोलते की, दर्शन तू मला आवडतोस हे मी तुला कसं सांगू!)
.........................................................

आउटडोअर....महाविद्यालय कबड्डी मैदान....दिवस

महाविद्यालयात कबड्डीची स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत कथेतील नायक दर्शन सुद्धा आहे. एक एक करत सर्व खेळाडू बाद होतात. शेवटी दर्शन व त्यातील एक खेळाडू अजूनही बाद झालेले नाही.

दर्शन- (साथ देणाऱ्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवत) राजू, आता आपण दोघेच राहीलो आहे.

राजू - (दर्शन कडे बघत) दर्शन, तू घे एन्ट्री आणि धूळ चारून ये त्यांना.

दर्शनला धीर आला आहे. प्रेक्षक व दर्शनचे मित्र मैत्रिणी त्याला प्रोत्साहन देत आहे. सर्व बाजूंनी एकच आवाज येत आहे.

"दर्शन, दर्शन, दर्शन, दर्शन......"

दर्शन मैदानात एन्ट्री करतो. खुप हुशारीने काही खेळाडूंना बाद करून परत फिरत असताना अचानक त्याची नजर रोहिणीवर पडते. त्याचा खेळ मंद होतो. समोरचे खेळाडू त्याला बाद करतात. राजू जमीनीवर जोरात उजवा पाय दोन-तीन वेळा आदळतो.
..........................................................

आउटडोअर...महाविद्यालयाबाहेरील वाहतूक रस्ता....दिवस

रोहिणी स्कूटीने महाविद्यालयाकडे येत आहे. तिने हेल्मेट घातलेले आहे. महाविद्यालयाजवळ गाडी आल्यावर गाडीचा वेग मंदावतो. अचानक दर्शन तिच्या गाडीसमोर येतो व स्कूटी थांसवण्याचा प्रयत्न करतो. गाडी थांबली जाते.

दर्शन- (गाडी थांबवत) अगं, थांब थांब जरा.

रोहिणी- अरे काय करतोस? आत्ता पडले असते ना! वेडा आहेस का तू.

रोहिणी गाडी थांबवते

दर्शन- मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.

दर्शनच्या मनात नेमके काय चालले आहे हे रोहिणी ने ओळखले आहे.

रोहिणी- ही काय वेळ आहे का? मी नंतर बोलते. आता मी घाईत आहे. हो बाजूला.

दर्शन- थोडं थांब ना!

गाडी पकडताना दर्शनचा अंदाज चूकतो व गाडी सहीत रोहिणी रस्त्यावर कोसळते. दर्शन तिला सावरतो. रोहिणीच्या हाताला जखम झाली आहे. हा सर्व प्रकार रोहिणीचे शिक्षक पाहत असतात. तेवढ्यात रोहिणीची नजर तिच्या शिक्षकावर जाते व ती लगेच दर्शनला बोलू लागते.

रोहिणी- इथे नको, मी तुला नंतर भेटते. तू जा येथून ताबडतोब.

तिला राग येऊ नये म्हणून दर्शन रोहिणीचे ऐकतो व काहीही न बोलता तो तेथून निघून जातो.
.............................................................

इनडोअर...महाविद्यालयातील मुख्याध्यापकाचे कार्यालय ....दिवस

मुख्याध्यापक व शिक्षक बसलेले आहेत. रोहिणी मान खाली घालून उभी आहे.

मुख्याध्यापक - रोहिणी

रोहिणी- यस सर

मुख्याध्यापक - सर काय सांगतात ते खरं आहे का?

रोहिणी- (मुख्याध्यापकाकडे पाहत रोहिणी बोलते) काय सर

मुख्याध्यापक - काॅलेजच्या बाहेर तुला अडविणारा तरूण कोण होता.

रोहिणी - (हळू आवाजात) कोण सर

मुख्याध्यापक - (शिक्षकाकठे पाहत) पाटील सरांनी मला जे काही सांगितलं आहे ते खरं आहे.

रोहिणीला काय बोलावे ते सुचेना. ती घाबरली आहे.

रोहिणी- (ओढणीचा कडा हातात घेत व मान खाली घालून) सर, मी त्या मुलाला ओळखतही नाही.

मुख्याध्यापक - (रागात व वरच्या स्वरात) खोटं बोलू नकोस. झालेला प्रकार मला समजला आहे. आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून तुमचे पालक जीवाचा आटापिटा करून तुम्हाला चांगले शिक्षण देतात. असं वागतात थोडा आई-वडीलांचा विचारही तुला आला नाही का? त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये असे वागवे नेहमी. ते काही नाही तू आता सरळ घरी जा आणि ताबडतोब पालकांना घेऊन ये.

रोहिणी- पण सर...

मुख्याध्यापक - (रोहिणीचे बोलणे मध्येच थांबवत) तू तुझ्या पालकांना घेऊन आल्याशिवाय तुला आपल्या काॅलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

.............................................................

इनडोअर...महाविद्यालयातील मुख्याध्यापकाचे कार्यालय ....दिवस

मुख्याध्यापक, शिक्षक, रोहिणीचे आई वडील बसलेले आहेत. रोहिणी तिच्या आईच्या उजव्या बाजूला उभी आहे. घडलेला सारा प्रकार मुख्याध्यापकांनी रोहिणीच्या पालकांना सांगितला.

मुख्याध्यापक - (रोहिणीच्या पालकांकडे पाहत) रोहिणीला विश्वासात घ्या आणि त्या मुलाची चौकशी करा. आपल्या काॅलेजचे नाव बदनाम होईल असे काही होऊ देऊ नका.

रोहिणी रडू लागते

रोहिणीचे वडील - सर तुम्ही काहीच काळजी करू नका. मी सांगतो तिला समजावून.

रोहिणीची आई - सर आमच्यावर विश्वास ठेवा. याच्यापुढे असा कोणताही प्रकार घडणार नाही. आम्ही सगळे याची काळजी घेऊ.

मुख्याध्यापक - ठीक आहे. आता तुम्ही येऊ शकता.

.............................................................

पुढील आठ-दहा दिवस रोहिणी महाविद्यालयात येत नाही. दर्शन रोज महाविद्यालयाकडे रोहिणीची वाट पाहत उभा असतो. रोहिणी काॅलेजला का येत नसावी हा विचार दर्शन सारखा करत असतो. काय करावे व काय करू नये हेच त्याला समजत नाही. शेवटी तो ठरवतो कि, रोहिणीला तिच्या घरी जाऊन भेटायचे.

आऊटडोअर...वाहतूक रस्ता ....दिवस

दर्शन रोहिणीच्या घराकडे येत आहे व त्याच रस्त्याने रोहिणी चालत आहे. दोघे एकमेकांना पाहतात. दर्शन रोहिणीजवळ येतो.

दर्शन - रोहिणी थांब जरा. माझं थोडं ऐकून तरी घे.

रोहिणी- तुझं मला काहीच ऐकायचं नाही. जा येथून निघून. झालेला तमाशा पुरे नाही का?

दर्शन- काय झाले सांगशील का मला तू.

रोहिणी- मला तुझ्याशी एक शब्द देखील बोलायची इच्छा नाही. निघून जा येथून.

दर्शन- ऐकून तरी घे थोडं. मी तुझी माफी मागण्यासाठी आलो आहे. तू मला माफ नाही करणार का?

रोहिणी जोरात दर्शनच्या गालावर मारते.

रोहिणी- नाही

तेथून रोहिणी जाण्यास वळते. दर्शन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. ती ऐकत नाही तेवढ्यात दर्शन तिचा सात ओढतो.

रोहिणी - (रागाने) माझा हात सोड

दर्शन  - अगं, मनापासून साॅरी म्हणतो ऐकून तर घे

रोहिणी  - किती वेळा सांगू मला तुझ्याशी बोलायचं नाही.

(दर्शन तिचा हात दाबून धरतो. रोहिणी तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करते पण हात सुटत नाही. रोहिणी दर्शनचा हात कसाबसा सोडवून घेते)

दर्शन  - (रागाने) तुला जायाचं आहे ना जा, तुझी आई घाल जा

(रोहिणी तेथून निघून जाते व तिच्या डोळ्यांत अश्रू आलेले आहेत. दर्शनला याचे खूप वाईट वाटते. )

(रोहिणी रस्ता ओलांडत असताना समोरून एक वाहन जोरात येते हे होत असताना रोहिणीचे लक्ष नसते. हे दर्शन सर्वपाहत असतो व तो तिच्या जवळ पळत जातो व तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो तिला पाठीमागे ओढतो. रोहिणी पाठीमागे पडते व तिच्या डोक्याला मार लागतो. तिला ओढत असताना दर्शनचाही तोल जातो व गाडी दर्शनला धडकते. दर्शन व रोहिणी च्या भोवती आजूबाजूची माणसं जमा होतात. दोघेही खाली खाली पडलेली आहे. रोहिणी च्या वर्गातील एक विद्यार्थी येतो. तो सागर आहे. रोहिणीला तो रिक्षात घालून रूग्णालयात घेऊन जातो.

(दर्शनलाही काही माणसं रूग्णालयात घेऊन जातात.)

(दर्शनचा पाय अपघातात मोडतो)

(या काळात सागर आणि रोहिणीची मैत्री खुप वाढते. ते दोघेही खुप जवळचे मित्र होतात)

दहा बारा दिवसांनी....वर्गात तास सुरू असतो.

शिक्षक - जे कोणी गैरहजर आहेत त्यांना बोलवून घ्या. ही जवाबदारी गैरहजर असणाऱ्या मित्रांची आहे.

(दूसऱ्या दिवशी दर्शनचे मित्र दर्शनला महाविद्यालयात घेऊन येतात)

(दर्शन व त्याचे मित्र वर्गात बसलेले आहेत. त्यांच्याबरोबर सागरही आहे. सागर दर्शनला बोलवून घेतो)

अर्जित हा सागरचा मित्र आहे तो त्याच्याजवळ जातो आणि बोलतो.

अर्जित - (सागराला ) काय भावा कुठं गायब आहेस?

त्यांना रोहिणीची मैत्रिणी दूरूनच पाहत असते. तिचा भास होतो कि, सागरला दर्शनचे मित्र मारत आहेत व ती रोहिणी येऊन सांगते. रोहिणी दर्शनकडे येतात व तेथून त्याचे मित्र निघून जातात. रोहिणी दर्शन जवळ येते.

रोहिणी - तू एकदा माझी वाट लावलास तुझं मन बरलं नाही का. तुला समाधान होत नाही का? तुझ्यामुळे माझ्या कोणत्याही जवळच्या माणसांना त्रास होता कामा नये आणि त्रास जाला तर माझ्याशी गाठ आहे.

(हे बोलून ती निघून जाते. सागर हे सर्व दूरून पाहत आहे)

दर्शनचा मित्र ॠशी तेथे येतो

ॠशी - तू रोहिणीला काहीच कसं बोलला नाही.  तिच्यामुळे तुझा पाय मोडला, तुझं करियर खराब झालं

दर्शन -  जाऊदे भावा

(सागर हे ऐकून रोहिणी जवळ जातो आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. रोहिणी काहीही ऐकून घेत नाही. सागर तिला रागाने दर्शनच्या सभोर उभा करतो. )

रोहिणी - (सागरकडे पाहत) सागर, तुला माहित नाही हा मुलगा खुप चालू आहे. तू याच्या नादाला नको लागू.

रोहिणी - (दर्शनकडे पाहत) तू का माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येण्याचा प्रयत्न करतोय. तू काहीही केलंस तरी आपलं आता नातं कधीही जुळणार नाही. निघून जा माझ्या आयुष्यातून"

(एवढं बोलून रोहिणी वळते व तेथून निघून जाते)

दर्शनला काय करावे काय नाही हेच कळेना. तो रोहिणी दूर जाईपर्यंत स्तब्ध उभा आहे व तिला पाहत आहे या दरम्यान बॅक ला एक गाणं वाजतं.

यल्लप्पा कोकणे

Thursday 8 November 2018

आठवणीत तुझ्या मी

आठवणीत तुझ्या मी राहतो दिन राती।।
आहे नाव तुझे सखे सदा माझ्या ओठी।।धृ।।

जीव हा बघ तुझ्यात गुंतला।।
भास हा तुझाच होई मजला।।
विसरू जगास साऱ्या जोडू प्रेमाची नाती।।
आहे नाव तुझे सखे सदा माझ्या ओठी।।१।।

नजरेचे इशारे आता लाख झाले।।
काळजात प्रिये खोल वार झाले।।
गाऊ गाणी प्रितीची घेऊन हात हाती।।
आहे सदा माझ्या सखे नाव तुझे ओठी।।२।।

आठवणीत तुझ्या मी राहतो दिन राती।।
आहे नाव तुझे सखे सदा माझ्या ओठी।।धृ।।

यल्लप्पा कोकणे
०८ नोव्हेंबर २०१८